गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; येत्या आठवड्यातील हवामानाचा विचार केल्यास, महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक स्वरूपात हलका वादळी पाऊस पडेल असा अंदाज गजानन जाधव यांनी व्यक्त केला आहे. पावसाचे प्रमाण प्रामुख्याने कोकण विभाग आणि त्याला लागून असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या आसपास जास्त राहील. यात साधारणतः ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरचा काही भाग, सातारा, पुणे तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, जुन्नर या भागांचा समावेश आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची काळजी घेणे आवश्यक आहे.
याव्यतिरिक्त विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र फारशा पावसाची शक्यता नसून हवामान साधारणत: कोरडे राहील, विदर्भ, मराठवाडा या आठवडाभरात फक्त १५ मिमी पावसाची अपेक्षा आहे. परभणी, बीड, बुलढाणा आणि अमरावतीतील धारणी-चिखलदरा भागात पावसाचे प्रमाण थोडे वाढू शकते, पण ते फार धोक्याचे नाही. (गजानन जावध)
गव्हाची पेरणी चांगली थंडी सुरू होईपर्यंत, म्हणजे साधारणत: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करू नये. लवकर पेरणी केल्यास वाढ खुंटणे, ओंब्या लहान पडणे आणि उत्पादनात घट येणे यांसारख्या समस्या येतात. हरभरा पिकासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे मर रोग (फ्युजेरियम विल्ट). हा रोग जास्त ओलाव्यामुळे वाढतो. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची सोय आहे, त्यांनी हरभऱ्याची पेरणी बीबीएफ (सरी-वरंबा) किंवा जोडओळ पद्धतीने बेडवरच करावी, जेणेकरून पाण्याचे योग्य व्यवस्थापन होऊन मर रोगावर नियंत्रण ठेवता येईल.
पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा (उदा. ट्रायकोबूस्ट डीएक्स) या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण हे सुरुवातीच्या काळात रोगापासून संरक्षण करते. ज्या शेतात दरवर्षी मर येते, अशा शेतकऱ्यांनी जमीन तयार करताना ओलावा असल्यास अर्धा किलो ट्रायकोडर्मा मातीत किंवा रेतीत मिसळून फेकून द्यावा.
तूर पिकासाठी सध्या पाण्याची नितांत गरज आहे, कारण जास्त पावसामुळे जमीन कडक झाली असून पाण्याचे ताण जाणवत आहे, ज्यामुळे पाने पिवळी पडून गळू लागली आहेत तुरीला पाणी देणे सर्वात महत्त्वाचे आहे. (गजानन जाधव)










