चक्रीवादळ महाराष्ट्रातून जानार, राज्यात एवढे दिवस मुसळधार पाऊस…
राज्यात सध्या सुरू असलेला पाऊस हा पुढील तीन दिवसांसाठी म्हणजेच २८, २९ आणि ३० ऑक्टोबर दरम्यान कायम राहणार आहे. हा पाऊस संपूर्ण राज्यात भाग बदलत पडेल. काही ठिकाणी हलका रिमझिम पाऊस असेल, तर काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर पडेल इतका जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. राज्यातील नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, लातूर, परभणी, बीड, धाराशिव, संभाजीनगर, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, कोकणपट्टी, मुंबई, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव यांसह सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस दररोज वेगवेगळ्या भागात हा पाऊस हजेरी लावेल. हा पाऊस प्रामुख्याने रात्रीच्या वेळी विजेच्या कडकडाटासह असणार आहे, तर काही ठिकाणी दुपारनंतर तो सुरू होईल.
राज्यात पाऊस येण्याचे मुख्य कारण म्हणजे दोन्ही समुद्रांमध्ये (अरबी समुद्र आणि बंगालची खाडी) तयार झालेले दोन कमी दाबाचे पट्टे हे चक्रीवादळात रूपांतरित झाले आहेत. अरबी समुद्रातील चक्रीवादळ गुजरातकडे जाऊन ओमानकडे सरकेल, तर बंगालच्या खाडीतील चक्रीवादळ तेलंगणातून महाराष्ट्रात प्रवेश करून पूर्व विदर्भातून छत्तीसगड आणि आसामकडे सरकेल. या दोन चक्रीवादळांच्या बाष्प खेचण्याच्या प्रक्रियेमुळेच महाराष्ट्रात पाऊस पडत आहे.
या प्रणालीमुळे, पूर्व विदर्भात (बंगालच्या खाडीच्या प्रणालीमुळे) आणि उत्तर महाराष्ट्रात/कोकणपट्टीत (अरबी समुद्राच्या प्रणालीमुळे) पावसाचे प्रमाण अधिक राहील. तर या दोन्ही वादळांच्या मधोमध असलेल्या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत आणि विखुरलेल्या स्वरूपाचा जोरदार पाऊस पडेल.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे हा पावसाचा शेवटचा टप्पा आहे. ३० ऑक्टोबरनंतर पाऊस हळूहळू राज्यातून निघून जाईल आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होईल. १ नोव्हेंबरपासून राज्यात काही ठिकाणी धुई, धुके किंवा धुरळे (धुक्याची चादर) पडण्यास सुरुवात होईल.
त्यानंतर २ नोव्हेंबरपासून थंडीमध्ये वाढ होत जाईल आणि ७ नोव्हेंबरपर्यंत चांगली थंडी जाणवेल. द्राक्ष बागायतदार आणि वेलवर्गीय पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी या बदलत्या हवामानाकडे लक्ष देऊन आपल्या पिकांची काळजी घ्यावी, कारण धुईमुळे फुलोऱ्यातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते.