दोन चक्रीवादळं सक्रिय, राज्यात या तारखेपर्यंत पावसाचा मुक्काम
पंजाब डख यांच्या हवामान अंदाजानुसार, सध्या राज्यात पावसाचे वातावरण आनखी 4 दिवस कायम राहील. 27 ऑक्टोबरपासून 30 ऑक्टोबर पर्यंत आणखी चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता असून, हा बदल मुख्यतः दोन चक्रीवादळे सक्रिय असल्यामुळे झाला आहे. हा पाऊस संपूर्ण राज्यामध्ये सर्वदूर पडणार नाही, तर तो भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपाचा असेल. याचा अर्थ काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर काही मध्यम, हलक पाऊस होईल आणि काही भाग कोरडेही राहतील अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.
हा विकुरलेला पाऊस राज्याच्या विविध भागांमध्ये अपेक्षित आहे. यामध्ये प्रामुख्याने पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाडा या भागांचा समावेश आहे. मुंबई, पुणे, नाशिक यांसह नांदेड, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, परभणी, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत हा पाऊस पडेल.
या पावसादरम्यान विजांचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऊस तोडणीसाठी गेलेल्या लेबरसह सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची आणि पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन डख यांनी केले आहे.
पावसाची समाप्ती आणि थंडीची चाहूल
राज्यातून पावसाचा जोर 1 नोव्हेंबरनंतर कमी होईल आणि वातावरण स्थिर होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर, 2 नोव्हेंबरपासून उत्तरेकडील भागातून थंडीची चाहूल सुरू होईल. सुरुवातीला नाशिक, निफाड, नंदुरबार आणि जळगाव यांसारख्या उत्तर महाराष्ट्राकडील जिल्ह्यांमध्ये थंडी जाणवेल आणि ती हळूहळू दक्षिणेकडील भागांकडे सरकत जाईल.
याच काळात, 2 ते 7 नोव्हेंबर दरम्यान राज्यात धुई, धुके किंवा धुराळे मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे. यासोबतच, शेतात दिसत असलेली जाळी धुई (कोळ्यांच्या जाळ्यांसारखे दव) ही निसर्गाची खूण असून, ती दर्शवते की राज्यातून पाऊस आता कायमस्वरूपी पुढील 12 दिवसांत निघून जाईल.