पंजाब डख ; राज्यात पुन्हा पावसाचा इशारा
हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी २० ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्रासाठी पुढील हवामानाचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपली शेतीची कामे त्वरित उरकून घेणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणीनंतर उघड्यावर असेल, त्यांनी तातडीने २० आणि २१ ऑक्टोबर या दोन दिवसांत ते झाकून घ्यावे. कारण, येत्या २२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या दरम्यान राज्यात भाग बदलत, विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्वदूर पडणार नसून, केवळ विशिष्ट भागांमध्ये त्याची हजेरी लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
या अंदाजानुसार, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांमध्ये पावसाचं स्वरूप अधिक असणार आहे. नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधील हवामान प्रणालींच्या लगत असल्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस पडेल.
उर्वरित राज्यात, म्हणजे अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, जळगाव, नाशिक, धुळे या उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या भागांमध्ये २२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान फक्त ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी तुरळक सरी पडतील. या पट्ट्यात पावसाचा जोर जास्त नसेल.
पावसाच्या अंदाजानंतर २८ ऑक्टोबर नंतर हवामानात बदल होण्याची चिन्हे आहेत. जळगाव, बुलढाणा, अकोला आणि बऱ्हाणपूरच्या सीमेलगतच्या पट्ट्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. जमिनीतली ओल कमी होण्याची वाट न पाहता ज्यांना पेरणी करायची आहे, त्यांनी आताच पेरणी करावी. कारण, एकदा ओल कमी झाल्यावर शेतकऱ्याचे नुकसान होते.
विशेषतः हरभरा (चना) पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी, पेरणी झाल्यावर लगेच हलक्या हाताने रोटायटर फिरवावा, अशी त्यांची शिफारस आहे. यामुळे हरभऱ्याचे दाणे मातीने झाकले जातात आणि चौथ्या दिवशी उगवणारे हरभरे डुक्कर उकरून खात नाहीत. २२ ते २८ ऑक्टोबर दरम्यान होणारा हा पाऊस फक्त काही भागांत असणार आहे, सर्वदूर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता, आपल्या पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन पंजाब डख यांनी केले आहे.